sanjay raut press conference: Sanjay Raut: संजय राऊत ‘त्या’ रात्री अमित शाह यांना फोन करुन म्हणाले… – sanjay raut talking with union hm amit shah on phone after ed raids in maharashtra
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत भाजपवर अनेक खळबळजनक आरोप केले. राज्यातील महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. या सगळ्यात ईडीने मला लक्ष्य केले तरी हरकत नाही. पण माझ्या कुटुंबीयांना लक्ष्य करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळेच जेव्हा माझे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर ईडीच्या धाडी पडल्या तेव्हा मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. मी त्यांना सांगितले की, मी तुमचा आदर करतो. पण हे जे काही सुरु आहे, ते ठीक नाही. माझ्याशी दुष्मनी असेल तर मला पकडा. माझा छळ करा, पण माझ्या जवळच्या लोकांना त्रास देऊ नका, असे मी अमित शाह यांना सांगितले. त्यानंतर मी दिल्लीतील इतर नेत्यांनाही फोन केल्याचे संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. त्यामुळे आता यावर भाजपचे केंद्रातील नेते काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहावे लागेल. (Shivsena MP Sanjay Raut on ED raids and action) संजय राऊतांना पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी उद्धव ठाकरे, शरद पवारांचा फोन, फक्त एवढंच सांगितलं…. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत अनेक गौप्यस्फोट केले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच माझी खाती असलेल्या बँकामध्ये जाऊन तपासणी केल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्या बँक खात्यांचा गेल्या २० वर्षातील तपशील काढून नेला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हा सगळा तपशील तपासावा. त्यांना माझ्याकडे काही सापडणार नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जायला तयार आहे. महाविकासआघाडी सरकारकडे १७० आमदार आहेत. त्यामुळे तुम्ही लोकशाहीचे संकेत पायदळी कसे तुडवू शकता, असा सवाल मी भाजप नेत्यांना विचारला. महाराष्ट्रातील सरकार पाडायचा प्रयत्न केलात तर ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले. पण भाजपचे नेते म्हणाले की, असे काहीही होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दल आणून सर्व थंड करू, असे संजय राऊत यांनी सांगितले. महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी आम्ही एकतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणू किंवा काही आमदार फोडू. त्यामुळे तुम्ही महाविकासआघाडी सरकार वाचवण्याच्या फंदात पडू नका. अन्यथा केंद्रीय यंत्रणा तुम्हाला ‘टाईट’ करतील, अशी धमकी भाजपच्या नेत्यांनी मला दिल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.