करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन, गर्दी करून उत्सव साजरा न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करावा, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून त्याचे काटेकोर पालन करावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
कोणते निर्बंध लादले?
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी या कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण करण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यातून करोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसंच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी करोनासंबंधीचे नियम पाळावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
कोणत्या गोष्टींना मुभा देण्यात आली?
शिवज्योती दौडमध्ये २०० कार्यकर्त्यांना सहभागी होता येणार आहे. याशिवाय शिवयजयंती उत्सवासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी गड किल्ल्यांवर मध्यरात्री जाऊन शिवजयंती साजरी करण्यास मात्र परवानगी नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणे आवश्यक असून शिवप्रेमींनी सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.