महापालिका प्रशासनाच्यावतीने करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी विविध विभागाचे कर्मचारी कामाला लागले आहेत. त्याशिवाय १२५ दररोज शहराची स्वच्छता राखण्याचं काम करत आहेत. त्यांच्या या कामामुळे कोल्हापूरकरांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मंगेशकर नगर आणि महालक्ष्मी मदिर प्रभागात या कर्मचाऱ्यांवर कोल्हापूरकरांनी फुलांचा वर्षाव केला. मंगेशकर नगर येथे तर या कर्मचाऱ्यांना नोटांचे हारही घालण्यात आले आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने काल १०,२७८ लोकांचं सर्व्हेक्षण करून त्यांची तपासणीही केली. यावेळी कुणालाही करोनाची लागण झाली नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. मात्र १५ फेब्रुवारीनंतर परदेशवारी करून एकजण कोल्हापुरात दाखल झाला आहे. त्याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४१६ वर गेली आहे. कालच्या एका दिवसात राज्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. करोनाचे रुग्ण बरे होत असले तरी संसर्गाच्या तुलनेत त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times