पिंपरी चिंचवड : शहरातील व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना १ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर नेपाळी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून खंडणी घेणे आणि व्यापाऱ्यांना धमकावणे असे गुन्हे दाखल झाले होते. अटक झाल्यानंतर केशव घोळवे यांची पुणे सेशन कोर्टाकडून जामिनावर सुटका झाली आणि आज पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Pimpari Chinchwad Municipal Corporation)

‘निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझे चारित्र्यहनन करण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे, याचा मी तीव्र निषेध करत आहे. माझ्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला व संपूर्ण महाराष्ट्रभर बातमी परसली. ज्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्या सर्वांना हळहळ वाटली व त्यांनी या घटनेचा खेदही व्यक्त केला आहे. मी नेपाळी मार्केटमधील लोकांकडून कसल्याही पैशाची मागणी केलेली नाही. धमकावणे तर खूप दूर आहे. या संपूर्ण पोलीस चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केलं आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. माझ्याबाबत राजकीय षडयंत्र वापरून शकुनी चाल केलेली आहे. परंतु या शहरातील तमाम गोरगरीब कामगार गप्प बसणार नाहीत, ते निवडणुकीमध्ये ज्यांनी हे कटकारस्थान केलं आहे त्यांना त्यांची जागा दाखवतील,’ अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजप नगरसेवक केशव घोळवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

वाइनची चर्चा सुरू असतानाच प्रवराकाठी पोलिसांनी केली मोठी कारवाई

काय आहे केशव घोळवे यांचा दावा?

‘मी १७ फेब्रुवारी २०१७-१८ मध्ये ‘अ’ प्रभाग अध्यक्ष असताना नेपाळी मार्केटचे काही प्रतिनिधी ‘अ’ प्रभाग कार्यालयात निगडी प्राधिकरण येथे मला भेटण्यास आले आणि त्यांनी त्यांच्यावर होणारी अतिक्रमण कारवाईची कैफियत माझ्यासमोर मांडली. मेट्रो प्रकल्पामुळे त्यांना विस्थापित केलं जात आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार मनपाचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून मी पुढे मेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि कारवाई स्थगित केली. मेट्रो स्टेशनसाठी नेपाळी मार्केटची जागा लागत आहे, अशी मेट्रोनी मागणी केली असता तिथेच या सर्वांना कायमचे विस्थापित केलं जात होतं. परंतु तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्याने महामेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा करून यांना सीएसआर अंतर्गत पक्के गाळे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला व ते पूर्ण झालेले आहेत. या मागचा मुख्य उद्देश हाच होता की शहरामध्ये हॉकर्सचे धोरण अवलंबलेलं नाही. यामुळे मुख्य रस्ते, चौक अतिक्रमणाने बाधित झालेले आहेत. त्याचा रहदारीस त्रास होतो व अपघात होतात. मी शहरामध्ये २५ वर्षापासून कामगार क्षेत्रात असंघटीत, संघटीत, शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित घटकांचे प्रामाणिकपणे काम करत आलेलो आहे. फक्त थरमॅक्स कंपनी पुरतेच काम केले नाही तर श्रमिक एकता महासंघाचा सरचिटणीस या नात्याने जिल्ह्यातील १२५ पेक्षा अधिक कारखान्यांमध्ये काम केलेलं आहे आणि अद्यापपर्यंत निष्कलंकच जीवन जगलेलो आहे,’ असं स्पष्टीकरण केशव घोळवे यांनी दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here