केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे ज्यांच्यामुळे घडले, ज्या कुटुंबामुळं ते मुख्यमंत्री झाले, त्यांच्याबद्दल बोलताना थोडीतरी जीभ चाचरली पाहिजे, असा घणाघात केसरकर यांनी केला. तुम्हाला बोलायचंच असेल, तर लोकसभेत बोला. चांगला ‘परफॉर्मन्स’ दाखवा, असं आव्हानही केसरकर यांनी राणेंना दिलं.
राणे समर्थक आणि शिवसैनिकात तुफान राडा
‘ज्यांचा संबंध नाही, त्यांच्यावर आरोप करून बदनामी करायची?’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांचे समर्थन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनाही लक्ष्य केलं होतं. या टीकेला केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. ही तुमचीच तपास यंत्रणा आहे. मग जो तपास केला, तो सीबीआय जाहीर का करत नाही? ज्यांचा काहीही संबंध नाही, त्यांच्यावर आरोप करायचे आणि बदनामी करायची? असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला.
‘तुम्ही कशाला उडी घेता?’
संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता? लोकसभेत तुम्हाला उत्तरे देता येत नाहीत, मग इथे येऊन का बोलता?, अशी प्रश्नांची सरबत्तीच केसरकर यांनी राणेंवर केली. जर किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता. मग तुमच्यावर किरीट सोमय्यांनी त्यावेळेस केलेले आरोप खरे मानायचे का? तुम्ही त्यावेळेस चौकशीला सामोरे न जाता लोटांगण घालून दुसऱ्या पक्षात गेले. सोमय्या कोणाबद्दल बोलले? राऊत कोणाबद्दल बोलले? त्यात तुम्ही का उडी घेता, असा सवालही केसरकर यांनी यावेळी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात चांगले रस्ते केले. राणेंनाही केंद्रात चांगलं खातं मिळालंय. पण त्यांनी काहीही केलं नाही. टीका करण्यासाठी हे खात दिलं आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.