यावेळी किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, दिशा सालियन हिच्यावर लैंगिक अत्याचार झालेले नाहीत. तरीही भाजपच्या नेत्यांकडून वारंवार तिचे चारित्र्यहनन केले जात आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणात लक्ष घालावे. महाराष्ट्रासारख्या राज्यात एखाद्या महिलेचे मृत्यूनंतरही चारित्र्यहनन होणे, ही चांगली गोष्ट नाही. दिशा सालियनच्या वडिलांनीही शवविच्छेदन अहवालात आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे सांगितले आहे. तिच्या वडिलांनी वारंवार ही बाब सांगूनही दिशा सालियनचे चारित्र्यहनन सुरु आहे. याविरोधात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले.
नारायण राणे यांच्या दाव्यानुसार दिशा सालियन मृत्यूप्रकरणात एका तरुण मंत्र्याचा सहभाग आहे. पण हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे दिले होते. त्याचं काय झालं, हे नारायण राणे यांनी सांगावे, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी दिले. दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाला असे सांगून तिची बदनामी केली जाते, हे पाहून आम्हालाही राग येतो. भाजपचे नेते महिलांच्या अब्रुची जराही किंमत करत नाहीत. अन्वय नाईक यांच्या कुटुंबातील महिला टाहो फोडून न्याय मागत आहेत. मात्र, भाजपने त्यांना न्याया दिला नाही. या प्रकरणात नारायण राणे यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावेत, असेही किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियन हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी या प्रकरणाला नव्याने वाचा फोडली आहे. दिशा सालियन हिने आत्महत्या करण्याचे कारणच नव्हते. दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी संबंधित फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. सात महिने उलटून गेल्यानंतरही दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. दिशा सालियनच्या इमारतीच्या वॉचमनकडे असणाऱ्या रजिस्ट्रारमधील पानं कोणी फाडली, कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला यामध्ये इतका रस होता, असे अनेक सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.