धामणगाव येथील तरुण अक्षय हा आज रविवारी काही मित्रांसह तापी नदीत पोहण्यासाठी गेला होता. काही मित्रांनी पोहण्यास सुरुवात केली, तर इतर मित्र मोबाइलमध्ये फोटो, व्हिडिओ तयार करण्यात दंग होते. अशातच नदीत असलेल्या एका खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेला अक्षय पाण्यात बुडाला. त्याने मदतीसाठी आटापीटा केला. त्यानंतर याच परिसरात मासे पकडणाऱ्या एका तरुणाने बुडालेल्या अक्षयला पाण्यातून बाहेर काढले.
पोटातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अक्षयचे कुटुंबीय व नातेवाइकांना धक्का बसल्याने त्यांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अवैध वाळू उपशाचा बळी
अवैध वाळू उपशामुळे नदीत खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळेच पोहता येत असूनही अक्षयचा बुडून मृत्यू झाला, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिसांनी अवैध वाळू उपशावर बंदी घालावी, कारवाई करावी अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली.
तिघा बहिणांचा एकुलता एक भाऊ
अक्षयचे बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. आई-वडील शेतमजुरी करतात. तो जळगाव शहरातील एका कापड दुकानावर काम करत होता. अक्षय तीन बहिणींचा एकुलता भाऊ होता. त्याच्या पश्चात आई-वडील व तीन लहान बहिणी असा परिवार आहे.