: तरुणाला चिरडून निघून जाणाऱ्या कार चालकाविरुद्ध अखेर ९ दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील आमोदा ते कानळदा रस्त्यावर झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचण्याच्या प्रयत्नात तरुण दुचाकीसह रस्त्यावर पडला आणि त्यानंतर त्याला कारने चिरडले. मात्र अपघातानंतर कार चालक न थांबता निघून गेला. याप्रकरणी शनिवारी मृत गोपालचे नातेवाईक सोपान सुभाष पाटील (वय ३८ रा. आव्हाणे ता. जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तावसे बुद्रुक येथील गोपाळ ज्ञानेश्वर चौधरी हा तरुण १७ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याच्या दुचाकीने जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे नातेवाईक तरुणाच्या लग्नसोहळ्याला जात होता. यादरम्यान आमोदा ते कानळदा रस्त्यावर एका शेतासमोर अचानक रस्त्यात दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गोपाल दुचाकीवरून खाली पडला आणि उठण्याचा प्रयत्न करत असताना पाठीमागून एका पांढऱ्या रंगाच्या कारने गोपाळला जोरदार धडक दिली.
या अपघातात गोपाळचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी आता कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतिष हाळणोर हे करत आहेत.
दरम्यान, मृत गोपाळ चौधरी शेती करत होता. त्याच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील ज्ञानेश्वर दामू चौधरी व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.