राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आकाशवाणी चौकात आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. मात्र आंदोलनापूर्वीच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली असून शहरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले?
औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात समर्थ साहित्य परिषदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल कोश्यारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमात गुरूचं महत्व सांगताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज काय असते? समर्थ नसते तर शिवाजी महाराजही नसते.’
दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली आहे.