विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे अरुण जगताप नुकतेच निवृत्त झाले आहेत. मात्र, मुदत संपल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे मतदारसंख्या कमी असल्याने या जागेवरील निवडणूक लांबणीवर पडली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या पाठोपाठ विधान परिषदेचीही निवडणूक होईल. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून कर्डिले या जागेचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी यासाठीची तयारीही सुरू केली आहे. कर्डिले हे जगताप यांचे व्याही आहेत. या मतदारसंघात जगताप आणि राष्ट्रवादी यांचे प्राबल्य लक्षात घेऊन कर्डिले हे राष्ट्रवादीत प्रवेश करून ही निवडणूक लढवणार असल्याचा विचार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे आणि पदाधिकार्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हा प्रवेश मुंबईत थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे आता कर्डिले यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. भनगडे हे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेत यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने व राजकीय गणित करून त्यांनी राष्ट्रावादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल काय म्हणाले शिवाजी कर्डिले?
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या पक्षांतराची चर्चा राष्ट्रवादीच्या काही मंडळींकडूनच मुद्दाम घडवून आणण्यात येत आहे. लोक आणि कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. आपण भाजपमध्येच असून भविष्यातही भाजपमध्येच राहणार आहोत. कार्यकर्त्यांनी अशा चर्चांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहनही कर्डिले यांनी केलं आहे.
दरम्यान, कर्डिले काहीही म्हणत असले तरी लोकांमधील चर्चा थांबायला तयार नाही. कारण ज्याला कोणाला ही निवडणूक लढवायची आहे, त्याला आतापासून तयारी करावी लागणार आहे. आपल्याला सोयीच्या ठरणाऱ्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्याची स्थिती पाहिली तर अस्तिवात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे. नवीन निवडणुका होणाऱ्या ठिकाणी काय परिस्थिती असेल, यावर विधान परिषदेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
तनपुरेंची भूमिका महत्वाची
विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. त्यांना राज्यमंत्रीपदही मिळाले. मधल्या काळात कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर सतत टीका केली आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत कर्डिले यांनीही तनपुरे यांना सतत टार्गेट केले. पुढील विधानसभा निवडणुकीचा उद्देशही त्यामागे आहे. अलिकडेच तनपुरे यांच्याविरूद्ध इडीची कारवाई झाली आहे. त्यामुळे कर्डिले यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशासंबंधी तनपुरे यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. कर्डिले राष्ट्रवादीत आले तर भविष्यात तनपुरे यांच्याविरोधात भाजपकडे प्रबळ उमेदवार नसेल. शिवाय कर्डिले विधान परिषदेवर निवडून आले तरी त्यांचा केवळ राहुरीशी थेट संबंध नसेल. याचा विचार करूनच तनपुरेंचीही भूमिका ठरेल, असं चित्र आहे.