सुरज जाधव हा पंढरपर तालुक्यातील मगरवाडी गावातील शेतकरी आहे. ‘पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको. शेतकरी नामर्द आहे. सरकारही शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही,’ असं म्हणत सुरजने विष प्यायलं. याबाबतची माहिती सुरजच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर कुटुंबियांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं. मात्र विषारी औषध प्राशन केल्याने सुरजची प्रकृती गंभीर होती. अखेर आज उपचारादरम्यान सुरजचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शेतीत सतत होणाऱ्या नुकसानीमुळे सुरज गेल्या काही दिवसांपासून तणावात होता असं सांगितलं जात आहे. याच नैराश्यातून अखेर त्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
राजू शेट्टी यांचा सरकारवर घणाघात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी हे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून राज्य आणि केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. पंढरपूरमधील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर शेट्टी यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. ‘पंढरपूरमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांसाठी मी मागील १२ दिवसांपासून आंदोलन करत आहे. मात्र मुर्दाड राज्यकर्त्यांना अजूनही जाग येत नाही. परंतु शेतकऱ्यांनी आपला जीव देऊ नये,’ असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.