काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टिळक भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा. मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती; परंतु काही कारणाने ती कार्यान्वित होऊ शकली नाही. ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सुरू केली. याकामी फडणवीस सरकारने ८०० कोटी रुपये रेल्वेला जमिनीसाठी दिले, पण आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमीनही मिळाली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत. ह्या पैशांचे काय झाले? योजना का फसली? जनतेचे पैसे रेल्वेला दान करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला? याची चौकशी एसआयटीची स्थापना करून त्यामार्फत करावी, हवे तर ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आम्ही हा मुद्दा अधिवेशनातही उपस्थित करणार आहोत, असे पटोले म्हणाले.
रश्मी शुक्लांविरोधात ५०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार
पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅपिंग केले. अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून, अमजद खान असे नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा सहभाग यामध्ये असेल तर, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत, असे समोर आले आहे. माझा फोन टॅपिंग झाल्याचा आरोप मी केला होता. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.
‘मोदी महापुरूषांपेक्षा मोठे आहेत हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न’
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजप सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत आहे. भाजपची ही विकृत्ती महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारी नाही. आजही पुण्यातील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या पगडीवर छत्रपत्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती. काँग्रेसने त्याला आक्षेप घेतल्यावर ती राजमुद्रा काढण्यात आली. नरेंद्र मोदी हे आमच्या महापुरुषांपेक्षा मोठे आहेत हे भाजप दाखवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मोदी हे महापुरुषांपेक्षा मोठे नाहीत, हे महाराष्ट्राच्या जनतेने ठणकावून सांगितले आहे. तरीही जाणीवपूर्वक भाजपकडून त्याची पुनरावृत्ती केली जात आहे, असे पटोले म्हणाले.
‘ओबीसी आरक्षण संपवायचा भाजपचा डाव’
ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही भाजपकडून अडवणुकीची भूमिका घेतली गेली आहे. आरक्षण संपवायचे हा त्यांचा डाव आहे. म्हणूनच ९८ टक्के अचूक असलेला डेटा केंद्र सरकार राज्य सरकारला देत नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा एकट्या महाराष्ट्रात नाही, तर मध्य प्रदेशातही आहे. तेथे भाजपचे सरकार आहे, मग तिथे भाजपमुळेच आरक्षण गेले असे त्यांचे म्हणणे आहे का? परंतु, मंडल आयोगाला विरोध करत कमंडल कोणी आणले हे जगाला माहीत आहे. भाजप मंडल आयोगाच्या शिफारशीच संपवायला निघाले आहे. पण हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा पटोले यांनी दिला.