यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली. रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना कोणत्या नेत्यांचे फोन गेले? रवी राणा यांच्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. तर शाईफेक करणाऱ्यांवर तितके गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ३०७ चा गैरवापर सुरु आहे. अशाने पोलीस बेछूट होतील. आम्हाला गोंधळ करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. काही तरी आश्वासन द्या. विधानसभा सदस्यावर अन्याय झाला, काही तरी आश्वासन मिळालयला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस केली.
रवी राणा सभागृहात प्रचंड आक्रमक
आमदार रवी राणा सोमवारी सभागृहात प्रचंड आक्रमक होताना दिसले. देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहानंतर विधानसभा अध्यक्षांनी रवी राणा यांना बोलण्यास परवानगी दिली. त्यावेळी रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. या दोघांनी फोन करूनच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास सांगितले. काही शिवभक्तांनी मनपा आयक्तांवर शाई फेकली, तेव्हा मी दिल्लीत होतो. मला बैठकीत असताना फोन आला आणि तुमच्यावर अमरावतीत ३०७ चा गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात आलं. पोलीस आयुक्त सांगतात, सरकारमधल्या लोकांनी हा गुन्हा दाखल करायला लावला. यानंतर १०० ते १५० पोलीस घरी गेले, वृद्ध आई होते, घरात घुसून तपासणी केली. खासदारांचाही अपमान करण्यात आला. या राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना फोन केला आणि गुन्हा दाखल करायला लावला. रवी राणांना अटक करायचे आदेश दिले, असे रवी राणा यांनी म्हटले.