अहमदनगर: पनचक्कीसाठी अवजड पंखा घेऊन जाणाऱ्या कंटेनरला हेलकावा बसल्याने त्यातील पंख्याचे पाते शेजारून जाणाऱ्या मोटारीवर पडले. या अपघातात मोटारीतील दोघे जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे नगर-मनमाड रस्त्यावर देहरे व नगरच्या दरम्यान हा अपघात झाला. रस्त्यावर पडलेले पंख्याचे पाते उचलण्यासाठी मोठ्या क्रेन मागवाव्या लागल्या. तोपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती.

नगर- मनमाड रोडवरील देहरे (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. सुशीला विलास रासकर (रा. खंडाळा ता. श्रीरामपूर), श्याम बाळासाहेब रासकर( रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) यांचा यामध्ये मृत्यू झाला. विलास अविनाश रासकर, आनंद विलास रासकर, शिल्पा शाम (सर्व राहणार खंडाळा ता. श्रीरामपूर) हे तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील रासकर कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. तेव्हा हा अपघात झाला.

वाचा: देवेंद्र फडणवीसांच्या कारवर चप्पलफेक, रोहित पवार म्हणाले…

नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू आहे. देहरेगावाजवळ काम अर्धवट आहे. अवजड साहित्य घेऊन जाणारी वाहने रात्रीच्या वेळी प्रवास करतात. देहरे गावाजवळ काम सुरू असलेल्या भागातून ही दोन्ही वाहने जात होती. कंटेनर वरच्या बाजूने, तर त्याच्या शेजारून अपघातग्रस्त बोलेरो जीप जात होती. तेव्हा खराब रस्त्यामुळे कंटेनरला हेलकावा बसला. त्यामुळे त्यावरील कित्येक टन वजनाचे पंख्याचे पाते बोलेरोवर पडले. यामध्ये मोटारीचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये दबले जाऊन दोघे ठार झाले.

Ahmednagar Accident

अहमदनगर अपघात

वाचा: युद्धामुळे पेट्रोल महागणार? नगरच्या वकिलांनी केली ‘ही’ तयारी

अपघातानंतर रस्त्यावर पाते पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पाते बाजूला करण्यासाठी आलेल्या क्रेनलाही ते उचलत नव्हते. त्यामुळे दुसऱ्या मोठ्या क्रेनच्या सहायाने पाते उचलून बाजूला करावे लागले. त्यानंतर दुपारच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली. एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here