विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, दरवर्षी ९ टक्के कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असतात. आता जो रिक्त पदांचा आकडा सांगितलेला आहे तो कमी आहे. रिक्त पदांची संख्या यापेक्षा जास्त आहे. गेल्या पाच-सहा वर्षात एकही नोकरभरती झालेली नाही. विधानसभेतही कर्मचाऱ्यांचा मोठा बॅकलॉग आहे. कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसेल तर आपण जनतेला सेवा कशी देणार? मागील सरकारच्या काळातही नोकरभरती केली गेली नाही. या रिक्त पदांची भरती लवकर होणे गरजेचे आहे. विविध विभागांत रिक्त असलेल्या लाखो पदांची भरती करण्यासंदर्भात राज्य सरकारची काय योजना आहे? आणि किती दिवसात नोकर भरती करणार, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले.
राज्यात दोन लाख ३ हजार ३०२ पदे रिक्त आहेत. करोनामुळे मागील दोन वर्षांत पदभरती झालेली नाही. सरकार ही पदभरती करण्याबाबत सकारात्मक असून लवकर ह्या पदांची भरती केली जाईल, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.