पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज रात्री ९ वाजता वीज दिवे बंद करून दिवे लावण्यात आले. पंतप्रधानांच्या या आवाहनामुळे पॉवरग्रीडवर परिणाम होऊन वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होईल अशी भीती वीज अभियंते, वीज तज्ञांनी व्यक्त केली होती. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही ऊर्जा विभागाची बैठक घेऊन आढावा घेत अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. आज, सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राज्यात विजेची मागणी १४ हजार ५२ मेगावॅट
इतकी होती. तर, विजेचे दिवे बंद करण्यापूर्वी राज्यात रात्री ८.५५ वाजता विजेची मागणी ११ हजार ५०० मेगावॅट इतकी होती. तर, मुंबईत १७०० मेगावॅट इतक्या विजेची मागणी होती. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर दिवे बंद केल्यानंतर राज्यात विजेच्या मागणीत सुमारे २८०० ते ३००० मेगावॅटची घट झाली. परिणामी विजेची मागणी ही ८६६८ मेगावॅटपर्यंत आली. मुंबईतही विजेच्या मागणी सुमारे ४५० मेगावॅटची घट दिसून आली.
कोयना व टाटा पॉवरचे जलविद्युत प्रकल्प हे फायदेशीर ठरले. जलविद्युत प्रकल्पात मागणीनुसार वीज निर्मिती कमी जास्त करता येते. सुरुवातीला कोयना प्रकल्पातून १८३० मेगावॅट आणि टाटा पॉवरच्या खोपोली येथील वीज केंद्रातून ४०५ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होती. विजेची मागणी जशी कमी होत गेली तशी तत्काळ कोयनेतून वीज निर्मिती ४१२ मेगावॅट, टाटाची १४ मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती कमी करण्यात आली होती.
महापारेषण विभागाने आजच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना आखल्या होत्या. त्याच्या परिणामी पॉवर ग्रीडवर कोणताही परिणाम झाला नाही. देशभरातही इतर राज्यांनी अशाच प्रकारची खबरदारी घेतली होती. त्यामुळे देशात कुठेही वीज पुरवठा खंडीत झाला नसल्याचे समोर आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times