पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची नक्कल करत निशाणा साधला होता. राज यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आमचं राजकारण नकलांवर उभं नाही, आमचं राजकारण कामावर आणि संघर्षावर उभं आहे,’ असा पलटवार राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut On Raj Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘काही लोक आजारी नसतानाही सक्रिय नसतात, पण मुख्यमंत्री आजारी असतानाही सक्रिय आहेत. मुख्यमंत्र्यांइतकं सक्रिय कुणीच नाही, म्हणून तर राज्य इतकं पुढं चाललं आहे.’

Video : संजय राऊत किती बोलतात, कसं बोलतात?, मिमिक्री करत राज ठाकरेंनी खिल्ली उडवली

ईडी कारवाईवरून भाजपवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील विविध नेत्यांवर कारवाईचं सत्र सुरू आहे. या कारवाईवरून संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, आम्ही खरं ते बोलणार आणि सत्य ते मांडणार. ईडीने चौकशीसाठी बोलावलं म्हणून आम्ही शांत बसलो नाही, आम्ही कोणाचे मिंधे नाही,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

मनसेच्या वर्धापनदिनी बोलताना पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं की, सोळावं वरीस विरोधकांसाठी धोक्याचं आणि मनसेसाठी मोक्याचं आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत यांनी फक्त ‘पाहू’ असं म्हणत उत्तर दिलं आहे.

दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजय राऊत यांनी उद्या गुरुवारी या निकालाविषयी बोलणं योग्य राहील, असं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here