भाजपनं उत्तर प्रदेशसह गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. या ठिकाणी देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा सपाटून पराभव केला. गोव्यातही भाजपनं २० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. गोव्यात भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांनाही दिलं जातंय. गोव्यातील विजयात मोलाचा वाटा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत भाजपच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आलं. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवले. नेत्यांनी यावेळी नाचून या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. फडणवीस यांनी सुरुवातीला सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचेही आभार मानले. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशाने मोदींची जादू अनुभवली, असे फडणवीस म्हणाले.
‘मोदी है तो मुमकिन है’ असं सगळ्यांनाच वाटतं आणि ते या निवडणुकांत अनुभवायला मिळालं. आपल्यासाठी मोदी आहेत. करोनाकाळात मोदी आहेत. मोदी आपल्याला मरू देणार नाहीत. बेरोजगार, उपाशी ठेवणार नाहीत असा जो सर्वसामान्य नागरिकांना विश्वास वाटतो, तो विश्वास यातून परावर्तीत झाला आहे, असे फडणवीस म्हणाले. या विजयाचा आनंद सगळ्यांनाच झाला असं नाही. काही लोकांना इतकी मळमळ झाली की, अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा असं आहे. इतकी मळमळ बरी नाही. कितीही मळमळ झाली तरी येणार तर मोदीच. काळजी करू नका. या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, महिलांचा आशीर्वाद मोदी आणि भाजपला आहे, असेही फडणवीस म्हणाले.