मुंबई : राज्य सरकारकडून आज विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर (Maharashtra Budget News) विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक शब्दांत टीका केली आहे. ‘कळसूत्री सरकारने विकासाचं पंचसूत्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलं आहे,’ असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray)

सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प राज्यातील जनतेची निराशा करणारा असल्याचं सांगत सरकारवर चौफेर टीका केली. ‘मागील २ वर्षात या सरकारने राज्यातील गोर गरीब, दीन-दलित, शेतकरी, कामगार, मराठा, ओबीसी, आदिवासी अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली आहेत. आताचं जे बजेट आहे ते देखील कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटला कोणत्याही प्रकारची दिशा नाही. मागली बजेटमधील आणि चालू असलेल्या कामाच्याच घोषणा या बजेटमधून करण्यात आल्या आहेत. आमच्याच योजनांचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत आहे. समृद्ध महामार्गासह बुलेट ट्रेनला विरोध करणारं सरकार आता त्याचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करत आहे. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारने केली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यातही हे सरकार अपयशी ठरलं आहे,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Maharashtra Budget : सीएनजी, पाईप गॅस होणार स्वस्त; ‘बजेट’मध्ये सरकारने केली मोठी घोषणा

पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत काय म्हणाले फडणवीस?

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती या महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आमची सगळ्यात मोठी अपेक्षा होती ती म्हणजे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यानंतर देशातील जवळपास २२ राज्यांनी कर कमी केला. मात्र या सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर करण्यासाठी एकही पैसा दिलेला नाही.’

फडणवीसांचा राज्य सरकारच्या बजेटचा निषेध

‘मराठवाडा ग्रीडचा खून या सरकारने केला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रही या बजेटमध्ये दिसत नाही. या बजेटने सर्वसामान्यांची मोठी निराशा केली आहे, त्यामुळे आम्ही सरकारने सादर केलेल्या बजेटचा निषेध करतो, धिक्कार करतो. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा मुद्दा या सरकारने बाजूला टाकला आहे. तसंच या कर्मचाऱ्यांसाठी नव्याने सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. आपलं अपयश लपवण्यासाठी फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवणं, एवढंच या सरकारला जमतं,’ असा टोला लगावत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here