‌वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी मदत केल्याबद्दल भारताने युक्रेन, रशिया आणि ‘रेड क्रॉस‘बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. युद्धासारख्या अतिशय तणावाच्या काळात भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल भारताने आभार मानले आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

जयशंकर म्हणाले, ‘युक्रेनमधील सुमी येथून नागरिकांना आणणे काहीसे आव्हानात्मक होते. त्यामध्ये अनेक अडचणी होत्या. त्यामुळे या अडचणी दूर सारून सर्वांच्या सहकार्याने आम्ही नागरिकांना स्वदेशी आणू शकलो.’ रोमानिया, हंगेरी, पोलंड, स्लोव्हाकिया, मोल्दोवा या युक्रेनच्या शेजारी देशांचेही जयशंकर यांनी आभार मानले. ‘ऑपरेशन गंगा’ या देशांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकले नसते, असेही जयशंकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार ऑपरेशन गंगा राबविण्यात आले. युक्रेन, रशिया या दोन्ही देशांसह रेड क्रॉस संघटनेनेही महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्वांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.’ याशिवाय विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, कॉर्पोरेट कंपन्या, विमान वाहतूक कंपन्या आणि भारतीय हवाई दल या सर्वांनी एकत्र येऊन दिलेल्या योगदानाबद्दलही आभार मानणे आवश्यक आहे, असेही जयशंकर म्हणाले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजिजू, हरदीपसिंग पुरी, व्ही. के. सिंह या मंत्र्यांचेही जयशंकर यांनी आभार मानले.

भारतीयांच्या सुटकेसाठी रशिया आणि युक्रेनने काही काळ युद्धविराम घेतल्यानंतर भारताने सुमी येथे अडकलेल्या ६०० नागरिकांची मंगळवारी सुटका केली. भारताने ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या १८ हजार नागरिकांना परत आणले. २६ फेब्रुवारी रोजी ही मोहीम सुरू झाली.

helicopter crashe मोठी दुर्घटना : भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; एका पायलटचा मृत्यू, दुसरा जखमी
missile fired accidentally : भारताचे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये कोसळले, संरक्षण मंत्रालयाने म्हटले…
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी मायदेशी

दरम्यान, युद्धग्रस्त युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेले भारतीय विद्यार्थी अखेर मायदेशी दाखल झाले. पोलंडच्या झेजो शहरातून दोन विमानांमधून निघालेले हे विद्यार्थी शुक्रवारी दुपारी भारतात पोहोचले.

युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन निघालेले भारतीय हवाई दलाचे विमान शुक्रवारी दुपारी १२.१५ वाजता हिंडन हवाईतळावर उतरले. तर, इंडिगोचे विमान दुपारी १२.२० वाजता दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. सुमी शहरातून बाहेर काढलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन निघालेले एअर इंडियाचे विशेष विमान शुक्रवारी पहाटे दिल्लीला पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले, की एअर इंडियाचे विशेष विमान गुरुवारी रात्री ११.३० वाजता झेजो येथून निघाले आणि शुक्रवारी पहाटे ५.४५ वाजता दिल्लीला पोहोचले. रशियाने रोमानिया, स्लोव्हाकिया, हंगेरी आणि पोलंडमार्गे युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर भारत युद्धग्रस्त देशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणत आहे.

Ukraine Crisis: युद्धाच्या काळ्या छायेत युक्रेनमधून २५ लाख नागरिकांचे स्थलांतर
Ukraine Talks with Russia: तुर्कीत पार पडलेली रशियासोबतची चर्चा निष्फळ, युक्रेनची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here