राज्यातील करोना लाट ओसरू लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज, शनिवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ३२४ करोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत राज्यभरातील ५२५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण ७७,२०,४७४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०९ टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८५,९०,२३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७०,९५१ (१०.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,००९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ५५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत शून्य करोनामृत्यू
मुंबई महापालिकेने आज, शनिवारी करोनासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, गेल्या २४ तासांत ३१ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. तर याच कालावधीत ६४ रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण १०, ३७,२९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही ३४७ आहे. तर रुग्णवाढीच्या दुपटीचा दर हा १६६९२ दिवसांवर पोहोचला आहे. आज सहा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एक रुग्ण ऑक्सिजनवर आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ही १६६९२ इतकी आहे.