मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर शहरातील राजेश चव्हाण याचा खून चोरीच्या उद्देशाने केल्याचे उघड झाल्यानंतर, आरोपीविरोधात आता कलम ३९७ अन्वयेही गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी ही माहिती दिली. शहरातील रानतळे येथील सड्यावर ९ मार्च रोजी राजापुरातील तरूण सलून व्यावसायिक राजेश चव्हाण ( वय ४०, रा. चव्हाणवाडी, राजापूर) याचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला त्याचा खून केल्याचा संशय होता. त्याच्या डोक्याला जखमा झाल्या होत्या. राजेशच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले होते.
या प्रकरणी तातडीने तपास करत, राजापूर पोलिसांनी रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला अटक केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. त्यानुसार सुरुवातीला हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास केला असता, त्याचा खून चोरीच्या हेतूने झाल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता ३९७ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयिताला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times