SSC HSC Exam Updates: राज्यभरात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक नवा नियम जारी केला आहे. राज्यात बारावीचा पेपर व्हॉट्स अपवर व्हायरल झाल्याच्या घटनेनंतर राज्य मंडळाने हा नियम बदलला आहे. हा नियम बुधवार १६ मार्च २०२२ च्या पेपरपासून अंमलात आणला जाणार आहे.

काय आहे नवा नियम?
आतापर्यंत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात उत्तरपत्रिका लेखन सुरू झाल्यानंतरही १० मिनिटे उशिरा आल्यास, अपवादात्मक परिस्थितीत, योग्य कारण असल्यास, प्रवेश दिला जात होता. मात्र यापुढे एकाही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लेखन सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाऊ नये, अशी सक्त सूचना राज्य मंडळाने सर्व केंद्रप्रमुखांना दिली आहे.

राज्य मंडळाने यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी एक परिपत्रक जारी केले आहे. यात मंडळाने असे म्हटले आहे की उत्तरपत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत या वेळेनंतर १० मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा करून केंद्रचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती. त्यासाठी केंद्रसंचालकांना त्या विद्यार्थ्याचे उशिराने येण्याचे कारण रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष किंवा विभागीय सचिव यांची दूरध्वनीवरून पूर्वामान्यता घेऊन आणखी दहा मिनिटे (एकूण २० मिनिटे) विलंब क्षमापित करून विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशा राज्य मंडळाच्या सूचना होत्या.

मात्र, या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेला प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने या प्रकरणांमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परिणामी ही सवलत १६ मार्च २०२२ पासून बंद करण्यात येत आहे.

SSC Exam 2022: परीक्षेचं टेन्शन आलंय? तर मग ‘हे’ उपाय नक्की करून पाहा

कोणत्या वेळेपर्यंत परीक्षेला येण्याची परवानगी?
१) विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.
२)परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यंत) म्हणजेच सकाळच्या सत्रात १०.२० वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात दुपारी २.५० पर्यंत परीक्षा कक्षात हजर राहणे बंधनकारक राहील.
३) विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होतेवेळी म्हणजेच सकाळच्या सत्रात १०.३० वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात दुपारी ३.०० पर्यंत पोहोचले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांची तपासणी करून त्यांना विभागीय मंडळाच्या मान्यतेने परीक्षेस बसण्याची परवानगी द्यावी.
४) परीक्षा सुरू झाल्यानंतर म्हणजेच सकाळच्या सत्रात १०.३० नंतर आणि दुपारच्या सत्रात दुपारी ३.०० नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येऊ नये.

राज्यात इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार १५ मार्चपासून सुरू झाली आहे तर बारावीची परीक्षा ४ मार्च पासून सुरू आहे.

दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण; ‘असे’ असेल प्रश्नांचे स्वरूप
बारावी केमिस्ट्री पेपर लीकप्रकरणी कारवाईला सुरुवात, जाणून घ्या अपडेट
बारावी पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर अभाविपचे आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here