अहमदनगर : शाळा-महाविद्यालयांतील मुलींना स्त्रियांसाठीचे कायदे, पोलिसांकडून मिळणारी मदत याची माहिती व्हावी, यासाठी कर्जतमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जतमधील विविध शाळांच्या विद्यार्थिंनींची थेट पोलीस ठाण्यात सहल काढण्यात आली. मुली-महिलांना निर्भय बनवणाऱ्या ‘कायद्याची सहल’ उपक्रमात सुमारे ४०० मुलींनी सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकारातून हा उपक्रम झाला. (Ahmednagar Police)

कर्जतमधील अमरनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, सोनमाळी कन्या शाळेतील मुली आणि शिक्षिका यामध्ये सहभागी झाल्या होत्या. मुलींनी निर्भय व्हावं, त्यांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या अनेक कायद्यांची माहिती व्हावी, अडचणीच्या काळात पोलिसांची मदत कशी मिळवावी?, तक्रार नेमकी कुठे दाखल करावी? त्यासाठी कोणती कलमे आहेत? महिलांच्या मदतीसाठी उभारलेले भरोसा सेल काय काम करते? ठाणे अंमलदार, गुन्हेगारी कक्ष, गोपनीय विभाग, तपासी अंमलदारांची कामे कशी चालतात याची सखोल माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुलींना दिली.

guidelines for holi: होळीनिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय; सणासाठी नवी नियमावली जाहीर

पोलीस आणि पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली व महिलांची या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या. ‘मुलींना आपल्या राहत्या परिसरात, बस स्थानकावर, प्रवासात येता-जाता, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात, ओळखीच्या नातेवाईकांकडून पाठलाग, अनोळखी फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्रास होत असतो. परंतु बदनामी, शाळा कायमची बंद होण्याच्या भीतीने कसलीही तक्रार न देता निमूटपणे अन्याय सहन करतात. मात्र पोलीस आपल्या संरक्षणासाठीच आहेत असं समजून मुलींनी निर्भय व्हावं, सोशल मीडियावर कुणीही आमिषाला बळी पडू नये’ असं आवाहन चंद्रशेखर यादव यांनी केले.

दरम्यान, तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात जाऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव मुलींना निर्भयतेचे धडे देत आहेत. आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांकही त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्रास देणाऱ्या टवाळखोरांना चाप बसला आहे. यासंबंधी यादव यांनी सांगतलं की, शाळकरी, महाविद्यालयीन मुलींना आपल्या स्वसंरक्षणासाठी उपलब्ध असलेली पोलीस यंत्रणा, महिलांविषयी असलेले कायदे, विविध कलमे, भरोसा सेल आदींचे ज्ञान असणे गरजेचं आहे. मात्र भीतीपोटी व कायद्याच्या अज्ञानामुळे मुली व महिला निमूटपणे अन्याय सहन करतात. अशा महिला-मुलींना निर्भय बनवण्यासाठी हा उपक्रम आम्ही वेळोवेळी राबवणार आहोत, असं यादव यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here