सांगली : ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारची सत्ता वाचवण्यासाठी शरद पवारांना वारंवार त्यांच्याच पक्षातील आमदारांना पक्षात राहण्याच्या विनवण्या कराव्या लागत आहेत. राष्ट्रीय राजकारणात स्वत:ला मोठे नेतृत्व समजणाऱ्या नेत्यांना गेल्या ३० वर्षात राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवता आला नाही. जनतेच्या पाठबळावर सत्तेत येणार नसल्याची खात्री असल्यामुळेच त्यांच्याकडून सत्ता वाचवण्याची धडपड सुरू आहे,’ अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar Attacks Sharad Pawar) यांनी केली. ते आज सांगलीत भाजप नगरसेवकांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

सांगलीत उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा लोकार्पण सोहळ्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते २ एप्रिल रोजी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादीने केलं आहे. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आज भाजपचे नगरसेवक आणि आमदारांची बैठक पार पडली.

नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी; छगन भुजबळांनी दिली महत्त्वाची माहिती

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते होण्यापूर्वीच २६ मार्च रोजी भाजप नेत्यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करावं, अशी आक्रमक भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे स्मारकाचे लोकार्पण आणि श्रेयवादावरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील काही राजकीय पुढाऱ्यांचे कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांच्या संस्थांनी घेतलेलं सुमारे १७६ कोटी रुपयांचे कर्ज माफ झालं तर, बँकेच्या कामकाजावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लवकरच या संदर्भातील सखोल माहिती घेऊन सत्ताधाऱ्यांचा डाव उधळून लावू, असा इशारा आमदार पडळकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here