औरंगाबाद : कालपासून एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येत आहे. तर यावर भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली असून, ‘एमआयएम कोणाच्या बाजूने लढते हे माहीत नाही, मात्र आमचं नाणं खणखणीत आहे, असं पंकजा मुंडे म्हणल्यात. औरंगाबाद येथील विमानतळावर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, एमआयएमचे इम्तियाज जलील महविकास आघाडीसोबत जायला तयार असतील तर त्यावर आम्ही टिप्पणी करण्याचे कारण नाही. कोण कोणासोबत गेलं तरी, भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे आणि जिंकणार आहे. एमआयएम कोणाच्या बाजूने लढते हे माहित नाही. मात्र, आमचं नाणं खणखणीत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. इम्तियाज जलील राष्ट्रवादीत प्रवेश करणार? युतीच्या चर्चेत छगन भुजबळांचं मोठं विधान धनंजय मुंडेंवर साधला निशाणा…
याचवेळी पंकजा मुंडे यांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरसुद्धा निशाना साधला. बीडमध्ये काय अवस्था झाली आहे हे सांगायची गरज नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने स्वतः लक्षवेधी टाकली आहे आणि त्यांनी सांगितले आहे की, बीडचा बिहार झाला आहे. त्यामुळे मी सुद्धा वेळोवेळी सांगत होते, बीडमध्ये माफियाराज आहे, वाळू माफिया आहे. पोलिसांकडे प्रत्येक तक्रार दाखल करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे. तर एसपीना रजेवर पाठवून नवीन एसपी देण्याची कारवाई झाली यातच सर्व काही आलं, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.