बारामती : जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित ‘काश्मीर फाईल्स’ (Kashmir Files) हा सिनेमा सध्या देशभरात चर्चेत आहे. या सिनेमातून ऐतिहासिक सत्य सर्वांसमोर मांडण्यात आल्याचं सांगत एका गटाकडून या कलाकृतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे, तर दुसरीकडे या सिनेमातून धार्मिक द्वेष निर्माण करणारा संदेश दिला जात असल्याचा आरोप करत काही घटक या चित्रपटावर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘काश्मीर फाईल्स’वर बोलताना शरद पवार यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. (Sharad Pawar Slams Bjp)
‘देश सध्या एकविचाराने चाललेला आहे. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल, असं लिखाण किंवा चित्रपट करणं टाळलं पाहिजे. ज्या चित्रपटाबद्दल आता सांगितलं जातं आहे, त्यामध्ये कळत-नकळत कॉंग्रेसला दोष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉंग्रेसकडे सत्ता असताना हे घडलं आणि तेच याला जबाबदार आहेत, असं ध्वनीत केलं जातं आहे. मात्र या सर्व बाबींचा आपण सखोल विचार केला पाहिजे. कश्मीरमध्ये जे काही घडलं आणि जे आता दाखवलं जातं आहे त्या कालखंडामध्ये देशाचं नेतृत्व कॉंग्रेसकडे नव्हतं तर विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याकडे होतं. याबाबत आज आवाज उठवणारे भाजपचे लोक विश्वनाथ प्रताप सिंहांच्या सरकारमध्ये सहभागी झालेले होते. या सर्व काळात देशाचे गृहमंत्री जे होते तेही भाजपच्या पाठबळावरच होते आणि जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट होती. फारुक अब्दुल्ला सत्तेतून दूर झाले होते. जे राज्यपाल होते ते कॉंग्रेसच्या विचारांचे नव्हते,’ असं म्हणत शरद पवार यांनी तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केलं आहे. मोठी बातमी : शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची खासदार इम्तियाज जलील भेट घेणार
पवारांनी भाजपला फटकारले!
‘काश्मिरी पंडितांचा प्रश्न उपस्थित करून आज पुन्हा सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या संबध कालखंडामध्ये जे घडलं त्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यामध्ये आता हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचे घटक हे पूर्ण सहभागी होते. त्यामुळे त्यांनी आता कारण नसताना हा विषय काढला हे योग्य नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपला फटकारलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या या टीकेवर भाजपकडून कसा पलटवार करण्यात येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.