वानवडीतील भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
गणेश पुंडलीक पाटोळे (वय १७, रा. साठे नगर, महमदवाडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि त्याचे मित्र रेहान, अजय हे रविवारी दुपारी वानवडीतील शिवरकर मार्गावरील महापालिकेच्या भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. रेहानला पोहता येत नसल्याने तो खोली कमी असलेल्या पाण्यामध्ये थोडा वेळ थांबला. त्यानंतर तो पाण्याबाहेर आला. अजय व गणेश या दोघांना पोहता येत होते. त्यामुळे ते दोघेही खोल पाण्यात उतरून पोहत होते. तलावामधील पाणी गढूळ झाल्याने अजयला पोहताना त्रास झाला. तो पाण्याबाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ होऊनही गणेश पाण्याबाहेर आला नाही. त्याचा जलतरण तलावामध्ये शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे अजय व रेहान या दोघांनी तात्काळ तेथील जीवरक्षकांना सांगितले. त्यांनी काही वेळाने जलतरण तलावामध्ये शोध घेतला. पण, त्यांनाही गणेश सापडला नाही. अखेर तलावातील पाणी कमी करण्यात आले. त्यावेळी गणेश पाण्यामध्ये बुडाल्याचे निदर्शनास आले. अजय, रेहान व जीवरक्षकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी वानवडी पोलीस तपास करत आहेत.