गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शेकडो कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून बसलेले आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्या तरी, विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी कायम आहेत. या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरू होती. याबाबत त्रिसदस्यीय समिती देखील स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळं संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे.
सरकारने आणखी आत्महत्यांची वाट पाहू नये – दरेकर
एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नसल्याचे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला. या अहवालाला मान्यता देण्यात आली आहे. आता यानंतर संपकरी एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, एसटी संपाबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने आता आणखी आत्महत्या होण्याची वाट पाहू नये. कुठल्याही परिस्थितीत तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ न्याय द्यावा, असे दरेकर यांनी म्हटले आहे.