मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. किरीट सोमय्या यांनी नारायण राणे व कृपाशंकर सिंह यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे पुढे काय झाले? ज्यांच्यावर आरोप केले जातात, ते भाजपमध्ये गेले की पवित्र होतात का? असा सवाल पटोले यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी धुडकावून लावली. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपांपैकी किती सिद्ध झाले? आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचे काम झाले आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.
देशात महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, शेतकरी, कामगार यांचे महत्वाचे प्रश्न आहेत. या महत्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून असे बेछूट आरोप करण्यात येत आहेत. भाजपचा हा आरोपांचा खेळ लोकांच्या लक्षात आला आहे. दररोज महाविकास आघाडींच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य असल्याची प्रतिमा करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु, जनता भाजपचा हा खेळ ओळखून आहे, असेही नाना पटोले म्हणाले.