नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज करोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत त्यांचं मत व्यक्त केलं. ‘१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र, ज्या गावातील लॉकडाऊन शिथिल केला जाईल, त्या गावात इतरांना प्रवेश मिळता कामा नये. त्यासाठी त्या गावाच्या सीमा १०० टक्के बंद केल्या जायला हव्यात. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या मंत्रिमंडाळाच्या बैठकीत मी सहभागी होणार आहे. बैठकीमध्ये लॉकडाउनबाबत माझे मत मांडणार आहे. लॉकडाऊन उठावं असं अनेकांचं मत असल्याचं मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देईन, असं मुश्रीफ म्हणाले.
‘जिल्ह्यातील २५ रुग्णांपैकी २१ जण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ‘मरकज’शी संबंधित आहेत तर काही जण त्यांच्या संपर्कात आले आहेत. आणखी कुणी असेल तर त्यांनी स्वतःहून पुढं यावं. स्वतःला व समाजाला संकटात टाकू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
घरात राहणं हेच औषध
जगभरात करोना पासून कोणी वाचले नाही. ब्रिटनच्या पंतप्रधानांनाही करोना झाला. करोनाग्रस्त वाघसुद्धा सापडलाय. प्रगत देश मेटाकुटीला आलेत. आपल्या देशावरही फार मोठे संकट आले आहे. घरात राहणं हेच सध्या त्यावर एकमात्र औषध आहे, असं ते म्हणाले.
डॉक्टरांनो, लोकांचा रोष ओढवून घेऊ नका!
खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवू नये. तुमच्यावर समाजाचा रोष निर्माण होणार नाही, याची काळजी घ्या. दवाखाने बंद ठेवणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times