शंतनू देवळेकर, शारदा पवार, युवराज सिंग, संपदा पोकळे, खुशबू लोंढे, कमलेश इंगळे, ऋतविक चव्हाण, वैभव इनामदार,निलेश वांद्रे, प्रशांत शृंगारे, अभिजित आहिरे अशी मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेले सर्वजण रावेत भोसरी परिसरातील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. रविवारी आठवड्याची सुट्टी असल्याने ते सर्व सकाळी ९ वाजता लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातळदरीत सकाळी ९ वाजता पोहोचले होते. तेथे पर्यटनाचा आनंद घेत फिरत असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काही जण सिगारेट ओढत होते. यावेळी सिगारेटचा धूर हा जवळच असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला लागल्याने धुरामुळे चवताळलेल्या मधमाशांनी सर्वांवर जोरदार हल्ला चढवला.
या हल्ल्यात जवळपास ११ जण जखमी झाले असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी एका कामगाराने या घटनेची माहिती पुणे ग्रामीण आयुक्तालयात फोन करून दिली. आयुक्तालयाने याबाबत लोणावळा शहर पोलीस व लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाला सूचना दिल्या. या घटनेबाबत कळताच शिवदुर्ग मित्र व वन्यजीव रक्षकचे अशोक मते, महेश मसणे, सुनिल गायकवाड, राजेंद्र कडू, आनंद गावडे, निलेश गराडे,गणेश निसाळ, शुभम काकडे, जिगर सोळंकी,आदित्य पिलाणे, आयूष वर्तक, हर्ष तोंडे, सिद्धेश निसाळ,अमोल सुतार, कपिल दळवी व मनोज वरे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी राजमाची येथील मनोज वरे यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. या ठिकाणी शिवदुर्ग मित्र व वन्यजीव रक्षकच्या पथकाने जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना अवघड अशा कातळदरीतून सुखरूप बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेत बसवून पुढील उपचारासाठी लोणावळ्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या सर्वांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.