मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्यापेनड्राईव्ह बॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात त्यांना परखडपणे उत्तर दिले नाही, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) माझ्यावर अजिबात नाराज नाहीत. प्रत्येकाची आपापली स्टाईल, शैली असते. उलट विधानसभेतील माझ्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी फोन करून माझे अभिनंदन केल्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीला राज्याचे नवनिर्वाचित गृहसचिव आनंद लिमये आणि मुंबईचे पोलीस आयु्क्त संजय पांडे हेदेखील उपस्थित होते. ही नियमित बैठक असल्याचे गृहमंत्र्यांकडून सांगितले जात असले तरी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच गृहखात्याच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शरद पवार या बैठकीत दिलीप वळसे-पाटील यांना काही सूचना देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीत तशी कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ सार्वजनिक कामांबाबत चर्चा झाली, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला.

fadnavis vs walse patil: फडणवीसांचे सरकारवर गंभीर आरोप; गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले प्रत्युत्तर
नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याच्या हाताळणीवरून नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभागृहात खमकेपणाने प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होते. परंतु, दिलीप वळसे-पाटील यांनी बॅकफूटवर जाऊन सावध पवित्रा घेतला. फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आक्रमक आणि सडेतोड भाषण करण्याची गरज होती, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांदेखत नाराजी व्यक्त केली होती. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची बाजू सावरून घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here