यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीत निधीवाटपाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या अंतर्गत धुसफुसीविषयी भाष्य केले. शिवसेनेतील ९० टक्के आमदार नाराज आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे नजर टाकल्यास त्यामध्ये मंत्री आणि त्यांच्या जवळच्या आमदारांनाच झुकते माप देण्यात आले आहे. तसेच ज्याठिकाणी पैशातून कमीशन मिळेल, अशा प्रकल्पांसाठीच जास्त तरतूद करण्यात आली आहे. अशा दुराग्रही भावनेने अर्थसंकल्प तयार केला तर आमदारांना काय मिळणार? निधी न मिळाल्यास मतदारसंघाचा विकास होणार नाही. त्यामुळे दिवस पुढे सरकतील तशी महाराष्ट्रातील राजकीय असुरक्षिता वाढणार आहे. मतदारसंघात विकासकामे न झाल्याने आमदारांना असुरक्षित वाटेल. याच कारणामुळे सध्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे. महाविकास आघाडीत केवळ राष्ट्रवादी खूश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांना स्वयंपूर्ण करत आहे, असा दावा बावकुळे यांनी केला.
काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांची नाराजी लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने १०० प्लस आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार आम्हाला किती निधी मिळाला बघा, असे सांगतील. या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण करून त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरु असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
ठाकरे सरकार न तुटणारा फेव्हिकॉल: चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजीवर भाष्य केले. शिवसेना आणि काँग्रेसचे २५ आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या २५ आमदारांनी तर उद्धव ठाकरे यांना आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात बसणार नाही, असे सांगितले होते. हे सर्व आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यावरून नाराज आहेत. पण अजित पवार हे हुशार आहेत. या सगळ्यामुळे सरकारवर किती परिणाम होणार ते मला माहिती नाही. ठाकरे सरकार हा तुटणारा फेव्हिकॉल आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.