नागपूर : ईडीने वकील सतीश उके यांच्या घरावर धाड टाकत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर घणाघाती टीका केली. यावेळी पटोले यांनी काँग्रेस आमदार नाराज असल्याच्या चर्चेवरही भाष्य करत नवा दावा केला आहे. ‘काँग्रेसचा कोणताही आमदार नाराज नाही. काँग्रेसचे आमदार नाराज असल्याच्या बातम्या भाजपकडून पेरल्या जात आहेत. मात्र भाजपमध्ये सर्वच आलबेल आहे का? त्यांचेही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि याबाबत योग्यवेळी माहिती देऊ,’ असं म्हणत पटोले यांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. (Nana Patole Slams Bjp Leaders)

काँग्रेसच्या २० ते २५ आमदारांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहीत भेटीची वेळ मागितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. मात्र पक्ष नेतृत्वाशी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमदारांकडून भेटीची वेळ मागण्यात आल्याचं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं आहे.

Russia Ukraine War: ‘नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर…’; युक्रेनच्या मंत्र्यांचं आवाहन

‘देशात अघोषित आणीबाणी’

भाजपकडून सत्तेत आल्यापासून देशात अघोषित आणीबाणी राबवण्यात येत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ‘केंद्र सरकारच्या अघोषित आणीबाणीविरोधात एक दिवस जनतेचा उद्रेक नक्कीच होईल. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी दररोज भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही,’ असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी यूपीए अध्यक्षपदाच्या चर्चेवरही भूमिका मांडली आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून तोच भाजपला पर्याय देऊ शकतो आणि यूपीए अध्यक्षपदाचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here