दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून भडकाऊ वक्तव्य करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने योग्य नसून याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत.’
पोलीस आयुक्तांच्या आरोपावर काय म्हणाले गृहमंत्री?
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी महसूल खात्यातील अधिकाऱ्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. पांडे यांनी जाहीररित्या केलेल्या आरोपांमुळे महसूल खात्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनीही पोलीस आयुक्तांची कृती योग्य नसल्याचं म्हटलं आहे. ‘जमिनीशी संबंधित गुन्ह्यांमध्ये भूमाफिया हे महसूल विभागातील अधिकारी, कर्मचार्यांना हाताशी धरून जागामालकांचा छळ करत आहेत. जमीन हडपण्यासाठी भूमाफियांकडून विस्फोटक परिस्थिती निर्माण केली आहे. महसूल अधिकारी हे आरडीएक्ससारखे आहेत, तर कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार डिटोनेटरसारखे आहेत,’ असं पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी म्हटलं होतं.