मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणल्यानंतर भाजपचे नेते एकापाठोपाठ एक प्रतिक्रया देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी नेहमीप्रमाणे तिखट शब्दांत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर प्रहार केला. संजय राऊत यांनी आता कितीही तडफड केली तरी त्यांची सुटका होणार नाही. संजय राऊत यांचा काळा पैसा बाहेर आला आहे. आता संजय राऊत यांना अटक होणारच, असे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Sanjay Raut : ईडीकडून संपत्ती जप्त, मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा संजय राऊत यांना फोन
संजय राऊत हा चोर आहे. गेल्यावेळीही संजय राऊत यांनी आयकराचे पैसे बुडवले होते. तेव्हा संजय राऊत यांना ५५ लाख रुपये परत द्यावे लागले. ते पैसे कशासाठी होते. तेव्हा काय संजय राऊत यांना वारीत पकडलं होतं का? आताही ईडीला पैशांचा माग (ट्रेल) सापडला असेल. त्यानुसार रितसर ही कारावाई झाली आहे. संजय राऊत यांना नोटीस देऊनही ते ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत. आता ते अशी कोणतीही नोटीस आलीच नाही, असे सांगत आहेत. मात्र, ईडीच त्यांना किती नोटीस पाठवल्या होत्या, हे जाहीर करेल, असे निलेश राणे यांनी म्हटले. संजय राऊत यांनी आता कितीही तडफड केली तरी यामधून त्यांची सुटका होणार नाही. संजय राऊत म्हणतात हा मेहनतीचा पैसा आहे. पण संजय राऊत मेहनतीचा पैसा कुठून आणणार. संजय राऊत ‘सामना’मध्ये काम करतात. तिथून हा पैसा येतो का, असा सवालही निलेश राणे यांनी विचारला.

Sanjay Raut:’ईडी’ने आमचं राहतं घरही जप्त केलंय, ‘ती’ जमीन कष्टाच्या पैशातून विकत घेतली होती: संजय राऊत
संजय राऊतांचा फ्लॅट आणि अलिबागमधील भूखंडांवर ईडीकडून टाच

ईडीने संजय राऊत यांच्या अलिबागमधील आठ जागा आणि दादरमधील एका फ्लॅटवर टाच आणली आहे. १०३४ कोटी रुपयांच्या पत्राचाळ भूखंड घोटाळ्यात राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत यांना आधीच अटक करण्यात आली आहे. या खटल्यात ईडीने गेल्याच आठवड्यात आरोपपत्र दाखल केलं होतं. याच प्रकरणात आता संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तेवर टाच आणली.

पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाले होते. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने या जमिनी खरेदी करण्यात आल्या होत्या. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने अशाचप्रकारे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीवर टाच आणली होती. तर दुसरीकडे यशवंत जाधव आणि राहुल कनाल या शिवसेना नेत्यांच्या घरावर आयकर खात्याने छापे टाकले होते. मात्र, आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईचा फेरा थेट संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांचे पुढचे लक्ष्य मातोश्री असणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here