भाजपचा स्थापना दिवस यंदा ‘या’ ३ कारणांमुळे महत्त्वाचा; काय म्हणाले PM मोदी? – bjp foundation day pm narendra modi slams congress and opposition leaders
नवी दिल्ली : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आज पक्षाचा ४२ वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजपच्या स्थापना दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करत शुभेच्छा दिल्या. तसंच यंदाचा भाजप स्थापना दिवस का महत्त्वाचा आहे, याच्यावरही पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं आहे. (Bjp Foundation Day Celebration)
‘यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. दुसरीकडे, जागतिक स्थिती झटपट बदलत असून भारताकडे नव्या संधी सातत्याने येत आहेत. तसंच भाजपचं डबल इंजिन सरकार चार राज्यांमध्ये पुन्हा सत्तेत आलं आहे, या तीन कारणांमुळे यंदाचा भाजप स्थापना दिवस महत्वपूर्ण आहे,’ असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘राऊत आता थोड थांबा’, गिरीश महाजनांचा संजय राऊतांना थेट इशारा
विरोधकांवर शरसंधान
नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. ‘देशात याआधी व्होटबँकेचं राजकारण केलं जातं. एका विशिष्ट गटासाठीच घोषणा करून इतर मोठ्या समूहावर अन्याय केला जात होता. तसंच कुटुंबाच्या कल्याणासाठी राजकारण केलं जात होतं. मात्र भाजपने कुटुंबाचं हित नाही तर देशहितासाठी राजकारण केलं,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
भाजप स्थापना दिनानिमित्त बोलताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने केलेल्या कामांबाबत भाष्य केलं आहे. ‘कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी देशासाठी काही केलं जाणार नाही, असं लोकांनी गृहित धरलं होतं. मात्र आता देशातील प्रत्येक नागरिक अभिमानाने सांगत आहे की देश बदलत आहे आणि पुढे जात आहे. सध्या पूर्ण जग दोन गटात विभागलं गेलं आहे, पंरतु केवळ भारत मानवतेच्या बाजूने ठामपणे बोलत आहे,’ असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.