‘भेटीनंतर आम्ही लगेच फोन केला आणि…’; अजित पवारांनी सांगितला शरद पवारांसोबतचा संवाद – ncp leader and dy cm ajit pawar reaction on sharad pawar and pm narendra modi meeting in delhi
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी पत्रकारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत विचारलं असता अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याचं समजल्यानंतर आम्ही कोपरगावमधून पवारसाहेबांना फोन केला. जे महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांबाबत मी देशाच्या पंतप्रधानांसोबत बोललो आहे, असं त्यांनी मला सांगितलं आहे,’ असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. (Ajit Pawar On Sharad Pawar)
शरद पवार यांनी पंतप्रधानांची संसदेत भेट घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात होते. त्यामुळे या भेटीबाबत स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत काल सायंकाळी माहिती दिली. राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबद्दल मी पंतप्रधानांशी बोललो, अशी माहिती पवार यांनी दिली. Bala Nandgaonkar: वसंत मोरेंबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार, बाळा नांदगावकर म्हणाले…
इम्तियाज जलील यांच्या आरोपावर काय म्हणाले अजित पवार?
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे अटकेत असताना शरद पवार यांनी केवळ शिवसेनेच्या संजय राऊतांचा प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. याबाबत एमआयएमचे नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही प्रश्नचिन्ह निर्माण करत पवारांनी नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा का समोर आणला नाही, असा सवाल विचारला. याबद्दल बोलताना अजित पवारांनी जलील यांच्यावर निशाणा साधला आहे. काही लोकांकडून विनाकारण गैरसमज निर्माण केला जात असून त्यात काहीही अर्थ नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात काही ठिकाणी मशिदीवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांबाबत हायकोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्नही अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला जावा, मी याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करेन, असं म्हटलं आहे.