मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News Today) यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘किणी खून प्रकरणात बाळासाहेबांना कुठे-कुठे जावं लागलं होतं हे आमच्या आठवणीत आहे,’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मनसेकडून टीका करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना आव्हाड यांनी किणी खून प्रकरणाचा दाखला दिला आहे.

मुंबईतील रमेश किणी खून प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात सीबीआयने राज ठाकरे यांची चौकशीही केली होती. मात्र नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात राज ठाकरे यांना वाचवण्यासाठी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन पंतप्रधानांची भेट घेतल्याची चर्चा झाली होती. याच घटनेचा दाखला देत आव्हाडांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे.

मोठी बातमी: राज ठाकरेंकडून वसंत मोरेंची उचलबांगडी; पुणे शहराध्यक्षपदी साईनाथ बाबर

नक्की काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

‘पवार साहेब आणि पंतप्रधान यांच्यातील कालच्या भेटीवर मनसेनी प्रतिक्रिया दिली आहे. असं म्हणतात की विस्मृती ही देवाने दिलेली माणसाला सर्वात मोठी देणगी आहे. मात्र किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठे-कुठे जावे लागले होते हे आमच्या स्मृतीत आहे,’ असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

‘जितेंद्र आव्हाडांना उत्तर देण्यासाठी आमचे इतर नेते पुरेसे आहेत’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ९ एप्रिल रोजी ठाण्यात जाहीर सभा होत आहे. मशिदीच्या भोग्यांवरून जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला या सभेतून राज ठाकरे उत्तर देतील, असं बोललं जात आहे. याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर देत आव्हाडांना टोला लगावला आहे. ‘राज ठाकरे हे मोठे नेते आहेत, जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आमचे संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव हेच पुरेसे आहेत,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here