दिल्लीत पोहोचताच सोमय्यांचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; यशवंत जाधव प्रकरणाबद्दल नवा दावा – kirit somaiya serious allegations against chief minister uddhav thackeray after ed action against yashwant jadhav
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्तांवर टाच आणली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. ‘हा १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. यशवंत जाधव यांनी म्हटलं आहे की माझ्याकडे तर फक्त १० टक्केच पैसे येत होते. मग उरलेले ९० टक्के रक्कम कुठे गेली? ती वांद्र्याच्या साहेबांकडेच गेली आहे,’ असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya Vs Thackeray Government)
युद्धनौक ‘आयएनएस विक्रांत’साठी जमा करण्यात आलेल्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी दिल्लीत धाव घेतली असून ते विविध नेत्यांना भेटणार असल्याची माहिती आहे. मात्र तत्पूर्वी किरीट सोमय्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. Yashwant Jadhav Property Seized: यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच; आयकर विभागाकडून ४१ मालमत्ता जप्त
‘जेवढे घोटाळेबाज सापडत आहेत त्या सगळ्यांचा बॉस वांद्र्यात राहतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माझ्याविरूद्ध कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी मी शांत राहणार नाही,’ अशा शब्दांत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे.
संजय राऊत यांना पुन्हा डिवचलं!
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात जोरदार वाक् युद्ध सुरू आहे. राऊत यांनी जोरदार टीका केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा पलटवार केला आहे. संपत्तीवर टाच आणली गेल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांना मुंबईत शक्तीप्रदर्शन करावं लागलं. राऊत यांना आता दिवसाही भूत दिसायला लागलं आहे, असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.