‘मुंबई केंद्रशासित करण्यासाठी भाजपच्या ५ नेत्यांनी गृहमंत्रालयासमोर मांडला प्लॅन’ – five bjp leaders presented a plan to make mumbai a union territory says shivsena sanjay raut
मुंबई : मुंबईत बसलेल्या भाजपच्या काही नेत्यांकडून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ‘किरीट सोमय्या यांनी भाजपला निवडणूक निधी देणाऱ्या काही बिल्डरांना हाताशी धरून मुंबई केंद्रशासित करण्यासाठी प्लॅन तयार केला आहे आणि याबाबतचं एक सादरीकरण त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयासमोर केलं आहे,’ असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut Allegations On Bjp)
भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यातच ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. ईडीच्या या कारवाईनंतर आक्रमक झालेल्या संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर युद्धनौका ‘आएनएस विक्रांत’साठी जमा केलेल्या पैशात अपहार केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर माजी सैनिकांच्या तक्रारीनंतर सोमय्या यांच्याविरोधात मुंबई पोलिसात गुन्हाही दाखल झाला. अशातच आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर नवा आरोप केला आहे. ‘विक्रांत आंदोलनाची सुरुवात बाळासाहेबांच्या आशीर्वादाने झाली, माझं पैसे जमवणं निव्वळ ‘सिम्बॉलिक’ होतं’
भाजपच्या नेत्यांना काहीही करून मुंबईवरील मराठी माणसांचा हक्का काढायचा आहे आणि या शहरावर केंद्राचं राज्य आणायचं आहे. या संपूर्ण टोळीचं नेतृत्व किरीट सोमय्या करत आहेत, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
‘आयएनएस विक्रांतसाठी किती पैसे जमा केले आणि त्या पैशांचं पुढे काय केलं? याचं उत्तर किरीट सोमय्या देऊ शकत नाहीत. कारण त्यांनी चोरी केली असून राष्ट्रीय सुरक्षेशी किरीट सोमय्या यांनी खेळ केला आहे,’ अशी टीकाही संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे पडसाद मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवरही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या आरोपाबद्दल भाजपकडून काय स्पष्टीकरण देण्यात येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.