मुंबई : मानखुर्दमधील साठेनगर परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीमध्ये झाले. लाठ्याकाठ्या आणि तलवारी घेऊन शेकडो तरुण रस्त्यावर उतरले. रस्त्याच्या कडेला पार्क करण्यात आलेल्या अनेक वाहनांची या जमावाने तोडफोड केली. मानखुर्द पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांवर गुन्हे दाखल करून सात जणांना अटक केली.

असं आहे सर्व प्रकरण…

साठेनगरातील म्हाडा कॉलनी परिसरात काही तरुणांनी दुचाकीवरून मिरवणूक काढली होती. या परिसरातून हॉर्न वाजवत जोरजोरात घोषणा देत जात असताना येथील काही तरुणांनी त्यांना रोखले आणि शांततेत जाण्यास सांगितले. यावरून दोन्ही गटांत वाद झाला. या मिरवणुकीवर आक्षेप घेणाऱ्या तरुणांनी दुचाकींवरील काही तरुणांना मारहाण केली. दुचाकींवरील तरुण काही वेळाने लाठ्याकाठ्या आणि तलवारी घेऊन पुन्हा याच परिसरात आले. त्यांना पाहून मारहाण करणाऱ्या तरुणांनी पळ काढला.

Yashomati Thakur: यशोमती ठाकूरांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज?
त्यानंतर, कुणीच दिसत नसल्याचं पाहून त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार, रिक्षा तसेच इतर वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला. तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही गटांतील तरुणांवर गुन्हा दाखल करून यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here