नागपूर: मैत्रिणीच्या वडिलांनी केलेल्या अत्याचारातून चिमूर तालुक्यातील (जि. चंद्रपूर) अल्पवयीन पीडिता साडेपाच महिन्यांची गर्भवती असून गर्भपात करताना प्रक्रिया अयशस्वी ठरल्यास जिवंत अर्भक जन्माला येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती वैद्यकीय समितीने उच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे, अशा परिस्थितीत बाळाचे संगोपन कसे करता येईल, याबाबत उपाय सूचविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.

मागील सुनावणी दरम्यान चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. समितीने आज अहवाल दाखल करीत गर्भपात करण्यासाठी उपयोग करण्यात येणाऱ्या औषधांची माहिती न्यायालयाला दिली. मात्र, गर्भधारणा होऊन साडेपाच महिन्यांचा काळ लोटल्याने गर्भपात करण्याची प्रक्रिया अयशस्वी ठरू शकते. त्यामुळे, पूर्ण वाढ न झालेले जिवंत अर्भक जन्मण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नमूद केले.

या प्रकरणाचे निराकरण करण्यासंबंधी समितीने कुठल्याही लेखी सूचना दिल्या नसल्याचे पीडितेचे वकिल एस. एच. भाटिया यांनी युक्तिवादामध्ये न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार, शपथपत्र दाखल करीत समितीने योग्य सूचना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तसेच, पूर्ण वाढ न झालेले बाळ जन्मल्यास त्या बाळाची काळजी कशी घेता येईल, याबाबत चंद्रपूरच्या जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचेसुद्धा नमूद केले. त्यावर पुढील सुनावणी १५ एप्रिल रोजी होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here