ऋतुराजच्या रुपात चेन्नईच्या संघाला पहिला धक्का बसला. ऋतुराज पुन्हा मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आणि त्याला १७ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर मोइन अली धावचीत झाला आणि चेन्नईच्या संघाला यावेळी दुसरा धक्का बसला. मोइन अलीला यावेळी तीन धावाच करता आल्या.पण या दोन्ही धक्क्यातून चेन्नईला बाहेर काढले ते उथप्पा आणि शिवम यांनी या दोघांनी सुरुवातीला संयत खेळ केला, पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्यांनी आरसीबीच्या गोलंदाजांना आपल्या फटक्यांच्या जोरावर संपूर्ण मैदान दाखवले. विजय मिळवण्यासाठी कशी फलंदाजी करायला हवी, याचा उत्तम नमुना यावेळी उथप्पा आणि शिवम यांनी सर्वांना दाखवून दिला.
आतापर्यंत आयपीएलमध्ये काय झाले, पाहा…आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघात २८ वेळा लढती झाल्या आहेत. यापैकी १८ वेळा चेन्नईने तर ९ वेळा बेंगळुरूने बाजी मारली आहे. एका सामन्याचा निकाल लागला नव्हता. चेन्नईविरुद्ध आरसीबीची सर्वोच्च धावसंख्या २०५ तर सर्वात कमी ७० अशी धावसंख्या आहे. आरसीबीविरुद्ध चेन्नईने २०८ सर्वोत्त तर ८२ सर्वात कमी धावसंख्या केली आहे. आयपीएल २०२२चा विचार केल्यास जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी अद्याप चांगली झालेली नाही. स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवसआधी कर्णधार बदलण्याचा निर्णय हिताचा ठरलेला दिसत नाही. संघातील स्टार गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे बाहेर असल्याने त्याचा स्पष्ट परिणाम दिसतोय. पॉवर प्लेमध्ये विकेट मिळत नसल्याने प्रतिस्पर्धी संघाला चांगली सुरूवात मिळताना दिसते. त्याच बरोबर डेथ ओव्हर्समध्ये यॉर्कर स्पेशलिस्ट संघात नाहीत. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्सची सुरुवात खराब झाली होती. पहिल्याच सामन्यात त्यांना २०५ धावांचे संरक्षण करता आले नव्हते. मात्र त्यानंतरच्या ३ लढतीत आरसीबीने कोलकाता, राजस्थान आणि पाच वेळा विजेते मुंबईचा पराभव केला.