मुंबई: वरळीतील करोनाचा कहर थांबताना दिसत नाही. काल संपूर्ण मुंबईत १०६ करोना रुग्ण सापडलेले असतानाच आज एकट्या वरळीत ५५ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ६९६वर गेली आहे. तर केईएममध्येही एका डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.

जी/ दक्षिण विभागात रुग्णांची संख्या १३३वर पोहोचली आहे. सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने करोना विषाणू तिसऱ्या टप्प्यात पोहोचत असल्याचं बोललं जात आहे. वरळीत झोपडपट्ट्या अधिक असल्याने करोनाचे थैमान रोखण्याची आरोग्य यंत्रणेसमोरील डोकेदुखी वाढली आहे. पोलिस आणि पालिकेने या परिसरातील अनेक भाग सील केले आहेत. या ठिकाणी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. त्यासाठी सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. औषधांची फवारणीही होत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारीही घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

केईएममध्ये डॉक्टरला लागणकाल केईएममध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याला करोनाची लागण झालेली असतानाच आज केईएमच्या एका डॉक्टरला करोनाची लागण झाली आहे. हा डॉक्टर वरळीचा रहिवासी असून तो कुणाच्या संपर्कात आला होता, याचा तपास सुरू आहे.

काल मुंबईत करोनामुळे पाच जण दगावले. त्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ४५वर पोहोचली आहे. काल केईएम रुग्णालयात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर कस्तुरबामध्ये एका ८५वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चार महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या सर्वांना ताप येत होता आणि श्वास घेण्याचा त्रास होत होता. यातील तिघांना मधुमेहाचा आणि एकाला दम्याचा त्रास होता.

दरम्यान, पालिकेने २४ वॉर्डांमध्ये क्वॉरंटाइनची व्यवस्था केली आहे. या सेंटरमध्ये सुमारे ११ हजार लोकांना ठेवण्यात आले आहे. करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या हाय आणि लो रिस्क रुग्णांना या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यात काल दिवसभरात ११७ नवे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ११३५वर गेली आहे. यात पुण्यात २ आणि कल्याण-डोंबिवलीतील एका मृताचा समावेश आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here