सरसंघचालक मोहन भागवत हे बुधवारी हरिद्वार येथे ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी आणि श्री गुरुत्रय मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते. यावेळी ते म्हणाले की, ‘अखंड भारताविषयी आम्ही अहिंसेच्याच मार्गाने पुढे जाणार आहोत, फक्त त्यावेळी आमच्या हातात काठी असेल. आमच्या मनात कोणाविषयीही द्वेष नाही, शत्रुत्त्वाची भावना नाही, पण या जगाला शक्तीचीच भाषा कळते तर आम्ही तरी काय करणार?’ असा सवाल भागवत यांनी उपस्थित केला आहे.
‘…तर हिंदू समाज जागा झाला नसता’
मोहन भागवत यांनी या कार्यक्रमात बोलताना हिंदू धर्माविषयी देखील भाष्य केलं आहे. ‘जे लोक सनातन धर्माला विरोध करतात, त्या लोकांचंही या धर्मासाठी योगदान आहे. कारण त्यांनी विरोध केला नसता तर हिंदू समाज जागा झाला नसता,’ असं भागवत म्हणाले.
दरम्यान, अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका हे देश पुन्हा भारताला जोडले जाऊन अखंड भारताची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी याआधीही आरएसएसकडून अनेकदा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी बुधवारी केलेल्या वक्तव्याची देशभरात जोरदार चर्चा होत आहे.