त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेनेही ‘काल आज उद्या’ या थीमवर बॅनर तयार करत शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मनसैनिक हा बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यासाठी निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी हा बॅनर ताब्यात घेतला. मनसेला शिवसेना भवनासमोर हा बॅनर लावता आला नसला तरी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘काल आज उद्या’ या मथळ्याखाली तयार करण्यात आलेल्या या फलकावर एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो आहे. त्याच्यापुढे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासोबतचा फोटो आहे. तर उद्या या रकान्याखाली असलेला भाग मोकळा सोडण्यात आला आहे. अशाप्रकारे मनसेने शिवसेनेला त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं
नसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरुन सध्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) शाब्दिक वार-पलटवार सुरु आहेत. राज ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेत आपण भोंग्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना मनसेच्या भोंग्यांच्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, या विषयावर मला फार टिप्पणी करायची नाही. पण मनसेने भोंगे लावल्यास त्यावरून देशातील वाढत्या महागाईबाबत जनतेला माहिती द्यावी. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि अन्य गोष्टींची दरवाढ कशामुळे झाली, हे मनसेने भोंग्यांवरून सांगावे. साठ वर्षांपूर्वीची इतिहास न उगाळता गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये काय झाले, हे सांगावे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.