इस्लामाबाद : इम्रान खान यांच्या सरकारविरोधात नॅशनल असेंब्लीत अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने खान यांचं सरकार कोसळलं. त्यानंतर विरोधी पक्षाने बहुमताचा दावा केला आणि पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षाचे नेते शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. मात्र हे सत्तांतर होताना पाकिस्तानमध्ये मोठं नाट्य झाल्याचे वृत्त आता समोर आलं आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान होत असताना इम्रान खान (Imran Khan News) यांनी त्यांच्या निवासस्थानी कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. या मुद्द्यावरून इम्रान खान यांचा पाकच्या लष्कराशी संघर्ष झाला आणि त्यांनी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना बरखास्त केलं. त्यानंतर बाजवा यांनी इम्रान खान यांच्या कानशिलात लगावली, असं सांगितलं जात आहे.

पाकिस्तानच्या विविध माध्यमांमध्ये इम्रान खान यांना कानशिलात लगावण्यात आल्याचं सांगत मोठी चर्चा होत आहे. इम्रान खान यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवेळी दोन लोक हेलिकॉप्टरमधून पोहोचले होते. या लोकांशी खान यांची ४५ मिनिटे चर्चाही झाली होती. मात्र हे लोक नेमके कोण होते, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Kolhapur By Election Result : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय, भाजपचा दारुण पराभव

इम्रान खान यांना मारहाण; अफवा की सत्य?

पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांद्वारे इम्रान खान यांना मारहाण झाल्याचा दावा केला जात असला तरी अद्याप याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक ए. के. सिवाच यांनी ‘टाइम्सनाऊ नवभारत’ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की, ‘लष्करप्रमुख बाजवा यांनी इम्रान खान यांना कानशिलात लगावली असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य असण्याची शक्यता कमी असून या अफवा असाव्यात. मात्र डीजी आयएसआयच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि पाकिस्तानच्या लष्करामध्ये संघर्ष सुरू होता आणि बाजवा यांची उचलबांगडी व्हावी, अशी इम्रान खान यांची इच्छा होती.’

इम्रान खान आणि लष्करामध्ये का झाला संघर्ष?

इम्रान खान यांचं सरकार कोसळण्यामध्ये लष्कराची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे खान आणि लष्करप्रमुखांमध्ये मतभेद होते, हे उघड आहे. ‘परराष्ट्र धोरणांवरून इम्रान खान आणि लष्करामध्ये मतभेद झाले होते आणि यातूनच संघर्षही वाढला होता. इम्रान खान हे अमेरिकेपासून दूर जात रशियासोबत मैत्री करण्यावर भर देत होते आणि लष्कराला हे मान्य नव्हतं,’ असं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक ए. के. सिवाच यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here