रामनवमीनिमित्त देशाच्या विविध भागांत काढण्यात आलेल्या मिरवणुकांवरील हल्ल्याच्या घटनांबाबत संताप व्यक्त करून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh Bjp) यांनी ‘रामनवमीच्या मिरवणुका आता पाकिस्तानात काढायच्या का,’ असा प्रश्न मंगळवारी केला.
‘रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेले हल्ले हे ‘गंगा-जमुना तेहजीब’चे दावे करणाऱ्यांना चपराक आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या देशात मोठ्या संख्येने नव्या मशिदी उभ्या राहिल्या. त्याला कुणीही विरोध केला नाही. मुस्लिमांची लोकसंख्या अनेक पटीने वाढली. त्याच वेळी पाकिस्तानात मात्र हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. तेथील हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आता मात्र सहनशक्तीचा अंत होत चालला आहे,’ असे ते म्हणाले. ‘आता रामनवमीच्या मिरवणुका पाकिस्तानात की, बांगलादेश, अफगाणिस्तानात काढायच्या? असे हल्ले दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या मिरवणुकांवर झाले असते तर राहुल गांधी, लालूप्रसाद यादव यांच्यासारखे नेते रस्त्यांवर उतरले असते,’ अशी टीकाही त्यांनी केली.
‘या देशाची १९४७मध्ये फाळणी झाली. हिंदू बहुसंख्याक व मुस्लिम बहुसंख्याक भाग असा भेदभाव करून इतिहासातील चूक पुन्हा करता कामा नये,’ असे सांगतच ‘मुहर्रमच्या ताजियामध्ये हिंदूंनी नेहमीच मनोभावे सहभाग घेतला,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.